भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे. स्टेडियमचे मैदान ७० मीटरचे असून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे आहे. या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा रणजीचा टी-20 सामना होता.[१][२]
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांनी या स्टेडियमचे काम पूर्णत्वाला गेले असून स्टेडियमचा लोकार्पण सोहळा क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते ६ एप्रिल २०१६ रोजी संपन्न झाला. लोकार्पण प्रसंगी शरद पवार व सचिन तेंडुलकर यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे क्रिकेटवीर व सुप्रिया सुळे, अजित पवार हे राजकारणी या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनीय क्रिकेट सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघ विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ यांच्यामध्ये खेळला गेला. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या (१२५ वी आंबेडकर जयंती) पूर्वसंध्येला स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला आहे. डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी (१०० वी आंबेडकर जयंती) वर्षात स्टेडियमचे काम सुरू झाले होते. येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी विशेष लक्ष दिलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली काम सुरू करण्यात आले. या स्टेडियमसाठी दक्षिण अफ्रिकेतून लॉन आणण्यात आले आहे.[३]
या स्टेडियमचे मैदान ७० मीटर एवढे असून या ठिकाणी क्रिकेटप्रेमींसाठी ८ पिच सरावासाठी बनविली आहेत. दोन पिच मुख्य स्टेडियममध्ये सामन्यासाठी बनविली आहेत. मैदानावर दोन खेळपट्ट्या असलेल्या या स्टेडियममध्ये १४ प्रॅक्टिस विकेट सेंटर, १० विकेट पिच आहेत.
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होणार आहेत, या दृष्टीने २२ हजार प्रेक्षकांसाठी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित गॅलरी, पॅव्हेलियनसह अन्य कामे नगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली. त्यामध्ये व्हीआयपी कक्ष, व्यायामशाळा, स्टेडियमच्या सर्व गॅलरींना आच्छादन आदींची व्यवस्था आहे.