भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यात एकमेव महिला कसोटी खेळणार असल्याने जाहीर केले. एप्रिल २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.
एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. सन १९९९ मध्ये अंजू जैन आणि चंद्रकांता यांनी भारतातर्फे पहिल्या गड्यासाठी रचलेल्या १३२ धावांच्या भागीदारीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्म्रिती मंधाना यांनी १५८ धावांची सलामी भागीदारी रचत मोडला. इंग्लंडने भारतावर फॉलो-ऑन लादून देखील दुसऱ्या डावात स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने डावाच्या फरकाने पराभव टाळत सामना अनिर्णित ठेवला. भारताची इंग्लंडमध्ये एकही महिला कसोटी सामना न हरण्याची परंपरा कायम राहिली.
इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारात मायदेशात १००वा विजय नोंदवला. दुसरा सामना देखील ५ गडी राखून जिंकत इंग्लंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने तिसरा एकदिवसीय सामना ४ गडी राखून जिंकला. इंग्लंडने महिला एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय संपादन केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताची कर्णधार मिताली राज हिने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील १०,२७३ धावांचा विक्रम मोडत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी आघाडीची क्रिकेट खेळाडू ठरली.
इंग्लंड महिलांनी ट्वेंटी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि गुण पद्धतीनुसार संपूर्ण दौरा १०-६ अश्या फरकाने जिंकला.